पालघर : सहअध्ययनाने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत पदांनुसार ६६५ पदे रिक्त असल्याने दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शाळा समायोजित केल्यास त्यामधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेऊन, शिक्षकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत होणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार (वित्त विभाग ‘३० जून २०१७ अ’) अल्प उपस्थिती असलेल्या सर्व शाळांची आवश्यकता तपासून व त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांची दुसरीकडे सोय करण्याची शक्यता तातडीने तपासून त्या शाळा बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यामधे दोन हजार १९८ शाळा आहेत. या सर्व शाळांना दर्जेदार भौतिक सुविधा पुरविणे कठीण आहे; परंतु या शाळा समायोजित झाल्यास दर्जेदार भौतिक सुविधा पुरविणे शक्य होऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी २१ मार्च रोजीच्या बैठकीत दिलेल्या सूचना, तसेच पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या बैठकीतील सूचनांचे पालन करीत हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितार्थ घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये शून्य ते ३० पटाच्या ५६८ शाळा आहेत. यापैकी १२९ शाळा एक किलोमीटर अंतरातील नजीकच्या शाळांमध्ये समायोजित होणार आहेत. त्यापैकी १२ शाळा दोन शाळा मिळून एक होणार असल्याने १२३ शाळा दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित झाल्याने बंद होणार आहेत.